महाविकास आघाडीतून काही महिन्यातच शिवसेना बाहेर पडणार होती..

Update: 2022-08-05 16:08 GMT

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर काही महिन्यांनी उद्धव ठाकरे यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी केली होती, असा दावा शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात युतीची बोलणी झाली होती आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारीही केली होती, पण त्याच दरम्यान भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाले आणि भाजपने बोलणी थांबवली, असेही केसरकर यांनी सांगितले आहे.

एवढेच नाही तर त्यानंतर भाजपने नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद दिले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही युतीची बोलणी बंद केली, असाही दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. त्याचबरोबर बंडानंतर एकनाथ शिंदे यांना बाजूला केले तर इतर आमदार आणि भाजपसोबत समेट करण्याची उद्धव ठाकरे यांनी दाखवली होती, असाही दावा केसरकर यांनी केला आहे.


दीपक केसरकारांना शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी दिले उत्तर, त्या काय म्हणाल्या पहा.. 


दीपक केसरकर हे रोज काहीही बोलून कळत नकळत शिंदे गटाची माती करत आहेत. एकीकडे मातोश्रीला मानतो म्हणायचं आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यापुढे कॅबिनेट मंत्रीपदासाठी बाजू मांडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हणत शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत घेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी भाजप सोबत युती करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बाजू मांडली असल्याचं म्हणत मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावरून मनीषा कायंदे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

दीपक केसरकर यांच्या या वक्तव्यानंतर मनीषा कायंदे यांनी टीका करताना म्हटला आहे की, नारायण राणे व त्यांच्या दोन मुलांबाबत शिवसैनिकांच्या भावना या अतिशय तीव्र आहेत. शिवसेनेला मित्रपक्ष म्हणता त्याच वेळी त्यांच्या विरोधकांना जवळ घेण्याचे काम करतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतला त्यात काय चूक होतं? असा प्रश्न उपस्थित करत कायंदे यांनी एकीकडे उद्धव ठाकरेंना मानतो म्हणायचं आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यापुढे कॅबिनेट मंत्री पदासाठी बाजू मांडण्यासाठी वारंवार असं काहीतरी बोलून प्रयत्न करायचा. दीपक केसरकर हे काहीही बोलून कळत नकळत शिंदे गटाची माती करत आहेत. काल सुप्रीम कोर्टात जे झालं त्यामुळे ते गोंधळलेले असल्याचं त्यांनी म्हटल आहे.

Tags:    

Similar News