मुंबई-नाशिक महामार्गावरील ‘त्या’ वास्तूकडे रोहिणी खडसेंनी लक्ष वेधलं

Update: 2023-07-26 13:54 GMT

सध्या लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झालेले आहेत. सार्वजनिक आय़ुष्यात वावरतांना त्यांच्या नजरेस आलेल्या चांगल्या-वाईट गोष्टी ते स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर दाखवत असतात, लिहित असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे या देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात.

मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा घाटातील एका वास्तूकडं रोहिणी खडसे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. मुंबईहून नाशिकला जातांना कसारा घाट जिथे संपतो तिथं ही वास्तू आहे. साधारणपणे २५० वर्षांपूर्वी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ही वास्तू बांधलीय. नाशिकला जातांना उजव्या बाजूला घाटनदेवीच्या मंदीरापासून साधारणपणे १४ किलोमीटर अंतरावर गोल घुमटाकार असलेली ही वास्तू आहे.

साधारणतः उलट्या घुमटाकार आकाराची ही प्राचीन वस्तू म्हणजे बारव (विहीर) आहे. मुख्य रस्त्यापासून फक्त ५० फूट अंतरावच हा बारव आहे. पूर्वीच्या काळी वाटसरूंना, यात्रेकरून घाटामध्ये विसाव्या दरम्यान पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून हा बारव २५० वर्षांपूर्वी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधला होता, अशी माहिती रोहिणीने दिली. उंचावर असलेल्या या बारव मध्ये भरपूर पाणी असतं अगदी उन्हाळ्यातही इथं पाणी असतं. ४० फूट व्यासाची ही बारवं पूर्ण दगडानं सुबक पद्धतीनं बांधण्यात आली होती. झाड-पाला, जंगली प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये, तसेच उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये, म्हणून त्यावर तीन बाजूंनी तीन अर्धगोलाकार आकाराच्या खिडक्या सोडत गोल घुमट बनविले आहेत. बारवमध्ये वर्षभर पिण्यायोग्य पाणी टिकून असते, अशी माहितीही रोहिणी यांनी व्हिडिओद्वारे दिलीय.


Tags:    

Similar News