काँग्रेसचा महाराष्ट्रातील आश्वासक चेहरा -ॲड. यशोमती ठाकूर

Update: 2020-01-01 13:01 GMT

महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन प्रेमलाकाकी चव्हाण, प्रमिलाताई पाटील, प्रभा राव यांचा काँग्रेसचा वारसा आज जर कोण निष्ठेने चालवत असेल तर त्या अॅड. यशोमती ठाकूर. प्रचंड लोकसंपर्क, विविध प्रश्नांची जाण आणि समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेली तोड, वक्तृत्वाला धडाडीपणाची जोड यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी कमी काळात यशोमती ठाकूर यांनी वेगळी ओळख तयार केली आहे.

चार तालुक्‍यात ‍‍‍विभागलेला तिवसा मतदारसंघ क्षेत्रळाच्या दृष्टीने मोठा समजला जातो. कधी काळी कम्युनिस्टांचा वरचष्मा असणाऱ्या या मतदारसंघात सलग तीनवेळेला विधानसभेवर जाण्याचा मान ॲड.यशोमती ठाकूर यांना मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या आमदार ठाकूर यांना विधीमंडळात एक अभ्यासू आमदार म्हणून पाहिले जाते. त्यांच्या भाषणाकडे पक्षातील सदस्यांचे लक्ष असतेच पण विरोधकही आवर्जून त्यांचे भाषण ऐकतात. विदर्भातील एकमेव काँग्रेसच्या महिला आमदार म्हणून यशोमती ठाकूर यांना ओळखले जाते. अत्यंत धडाडीच्या आणि आक्रम‍क अशा आमदार ठाकूर यांचा आपल्या मतदारसंघाची संघटनात्मक बांधणी करुन चांगला जनसंपर्क ठेवल्याने अटीतटीच्या निवडणुकीत देखील विजय मिळवला.

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार भैय्यासाहेब ऊर्फ चंद्रकांत रामचंद्रजी ठाकूर यांच्या त्या कन्या. १९७८ ला हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यनंतर भैय्यासाहेब ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात काँग्रेसला बळकटी आण्याणचे महत्वाचे काम केले. आपले माध्यमिक शिक्षण अमरावतीच्या होली क्रॉस इंग्लीश मिडीयम स्कूलमधून पुर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याची (लॉ) पदवी मिळवली. याच दरम्यान त्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे गिरवत होत्या. हळूहळू त्यांनी काँग्रेस पक्षातील पक्षसंघटनात्मक बांधणीमधले महत्वाचे स्थान प्राप्त केले. राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली पक्षानेअधिकाधिक तरुण चेहऱ्यांना संधी द्यायला सुरुवात केल्यानंतर यशोमती ठाकूर यांना पक्षसंघटनेतील महत्त्वाची पदे देऊ केली.

राज्यातील डाव्यांचा जोर ओसरू लागला तसा हा मतदारसंघही डाव्यांच्या हातातून निसटून गेला. कधी काळी डाव्यांचे राजकारण करणाऱ्या मतदारसंघात उजव्या विचारसरणीचे कमळही फुलले आणि मग सत्तेचा हा जोरात फिरलेला लंबक मध्यममार्गी काँग्रेसवर येऊन स्थीरावला. २००९ नंतर सातत्याने हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहीला आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न असो वा पाण्याचे प्रश्न आमदार ठाकूर यांनी कायम आपल्या आक्रमक शैलीत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. पाण्यसाठी अनेक आंदोलने केली आहेत. जनतेच्या मुलभूत समस्या सोडवण्‍याकडे त्यांचा कल असतो. म्‍हणूनच यशोमती ठाकूर यांना इथली जनता मुलीसारखी मानते. त्यांची लोकप्रियता हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे.

यावर्षीची निवडणुक त्यांच्यासाठी अत्यंत चुरशीची होती. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनादेश यात्रेची सुरूवात तिवसा मतदारसंघातील गुरूकुंज मोझरी या गावापासून केली. या जनादेश यात्रेच्या निमित्ताने फडवीस यांनी थेट यशोमती ठाकूर यांना आव्हान दिले. असे असले तरी यशोमती ठाकूर यांची मतदारसंघातील ताकद ‍त्यांच्या विजयाने सगळ्यांना समजली. २०१४ साली निवेदिता चौधरी यांना भाजपाने उमेदवारी दिली होती, यावेळीही भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली होती. दोन्ही वेळेला आमदार ठाकूर यांनी त्यांचा दारूण पराजय केला. यावेळी ५८, ८०८ एवढी मते मिळवत त्यांनी आपल्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली.

https://youtu.be/rUGi00fjMiI

 

 

 

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/325278884755499/?t=1

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Similar News