भारतीय महिलांचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, विश्वचषकात विजयी सुरूवात!
X
महिला विश्वचषकात भारताची सुरुवात चांगली झाली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात मिताली ब्रिगेडने पाकिस्तानचा १०७ धावांनी पराभव केला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 244 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 137 धावांवर सर्वबाद झाला होता.

वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाला कधीही पराभवाला सामोरे जावे लागले नाही. या विजयासह टीम इंडिया विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 244 धावा केल्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 137 धावांवर गारद झाला. भारताकडून सीनियर झुलन गोस्वामीने 2 विकेट घेतल्या, तर टीम इंडियाची स्टार राजेश्वरी गायकवाडने 10 षटकात 31 धावा देत 4 बळी घेतले.

पाकिस्तानची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली
या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. पाकिस्तानकडून सर्वाधिक धावसंख्या ३० होती, याचा अंदाज यावरून लावता येतो. पाकिस्तानची सलामीवीर सिद्रा अमीनने 30, तर डायना बेगने 24 धावा केल्या. या सामन्यात पाकिस्तानची धावसंख्या 43 षटकात सर्वबाद 137 अशी होती. टीम इंडियाकडून सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या आहेत. झुलन गोस्वामीने दोन, मेघना सिंगने एक, राजेश्वरी गायकवाडने 4, दीप्ती शर्माने 1, स्नेह राणाने दोन गडी बाद केले.

अशी होती भारताची फलंदाजी
भारताच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. तिसऱ्या षटकात शेफाली वर्माच्या रूपाने टीम इंडियाला पहिला धक्का बसला, मात्र त्यानंतर दीप्ती शर्मा आणि स्मृती मानधना यांनी भागीदारी करत भारताला संकटातून बाहेर काढले. भारताची मधली फळी पूर्णपणे खराब कामगिरी करत असल्याचे दिसून आले.

एक वेळ अशी होती की भारताच्या अवघ्या 18 धावांत 5 विकेट पडल्या होत्या. पण अखेरीस पूजा वस्त्रेकर आणि स्नेह वर्मा यांच्यात शतकी भागीदारी झाली आणि टीम इंडियाने मोठी धावसंख्या गाठली. स्नेह राणाने ५३ धावा केल्या, तर पूजाने ६७ धावांची खेळी केली. पूजा वस्त्रेकरची नंतर सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया नंबर १
पाकिस्तानविरुद्धच्या या शानदार विजयानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपच्या पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारताने एक सामना खेळला असून त्याचे 2 गुण आहेत, तर निव्वळ धावगती 2.14 आहे. यासोबतच पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत तळाला पोहोचला आहे.
