भाजपविरोधात कॉंग्रेसचं #SpeakUpIndia अभियान, 'या' आहेत मागण्या?

Update: 2020-05-29 08:13 GMT

कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या गरिबांना, स्थलांतरीत मजूरांना, लघुउद्योगांना सरकारने मदत करावी म्हणून कॉंग्रेस पक्षाकडून देशभरात #SpeakUpIndia अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत सर्व कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते, समर्थक आणि स्वयंसेवक फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, युट्यूब या सोशल मीडियाच्या माध्यमांतून सरकारला कोरोनाच्या संकटावर काही सूचनांचं पालन करण्याची मागणी करणार आहेत.

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी या अभियानाची घोषणा केली आहे. तसेच प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी अभियानास सुरुवात करताना त्यांनी सरकारला काही सूचना केल्या आहेत. सोबतच भाजपने आता राजकारण बंद करावं. ही राजकारण करण्याची वेळ नाही. असा सल्ला दिला आहे.

“युपीतील नागरिकांसाठी आम्ही १००० बस पुरवल्या होत्या पण राजकारणामुळे तुम्ही त्या नाकारल्या. तुम्ही त्या बसवर भाजपचं स्टीकर आणि झेंडे लावले असते तरी आम्हाला चाललं असतं. युपी सरकारने १२ हजार बस स्थलांतरीतांच्या सेवेसाठी चालविल्या जातील असं म्हटलं होतं पण त्या फक्त कागदावरच चालत आहेत.” अशी बोचरी टीका प्रियांका गांधी यांनी यावेळी केली.

काय आहेत या सूचना?

-गरजू कुटुंबांना त्वरित १० हजार रुपयांची मदत करावी.

-स्थलांतरित मजूर अजूनही शहरांमध्ये अडकले आहेत त्य़ांना पुढील सहा महीने खात्यात ७५०० रु. द्यावेत.

-घरी परतलेल्य़ा स्थलांतरित मजूरांना गावात मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करुन द्यावा. मनरेगाच्या कामाच्या दिवसांची मर्यादा १०० दिवसांवरुन २०० दिवसांपर्यंत करावी.

-लघु उद्योग, दुकानदार, लहान व्यापारी यांना असं वित्तीय पॅकेज द्यावं जेणेकरुन त्यांच्यावर कर्जाचा बोजा होऊ नये.